Friday, 12 October 2018

बाप्पा

हा येतो काय,
दीड दिवस पाहुणचार करवून घेतो काय...
नी जरा कुठे घरातली इतके वर्षांची कर्ती नी आता 'मार्गदर्शक' झालेली  मंडळी, आपल्या नातवंडांना घेऊन  शिळोप्याच्या गप्पा मारायला बसताय्त,
तोवर पुनःश्च पुढल्या प्रवासाला निघतो काय...

गेली नव्वद वर्ष हीच प्रथा सुरू आहे...

सुमारे चार पिढ्या...
 एकेका घरात कितीएक 'रोल' चेंजेस पाहीले असतील त्यानं आजवर...

काल पर्यंत आईच्या मागे मागे फिरणारी पोरं टोरं, आज गणपतीच्या आगमनाला नी प्रस्थानाला स्वतःहून मुर्ती उचलताहेत... आरत्या घेताहेत, पूजा करताहेत....

काल पर्यंत आरत्या, पूजा करणारी पिढी आज ह्या नव्या पिढीच्या खांद्यावरून, फक्त 'सगळं नीट सुरू आहे ना..' बघत हाती टाळ, झांजा घेऊन शांतपणे उभे राहाताहेत...

कालचं मस्त परकर पोलकं घालून घरभर फिरणारं पिल्लू आज आईला, काकवांना विचारत उकड काढत्ये.. मोदक वळायला मदत करत्ये....

कालच खारीच्या पावलानी आलेली एखादी सुनबाई, आज 'आई, तीन वाट्या खोबरं नी दोन वाट्या गुळ घेऊना?' म्हणत स्वैपाकघराचा ताबा घेत्ये..

काल जातीनं सारणात गुळ किती, तार कशी हवी हे ठरवणारी एखादी सासुबाई, आज आपलं बॅटन पुढल्या पिढीकडे देऊन आपल्या नातवंडांच्या जेवणखाणाचं बघत किंवा वाती वळत, फुलांची, पत्रीची जुळवाजुळव करत बसल्ये...

सगळंच स्वप्नवत....!

------

यार गजानना....

अभी अभी तो आये हो...
बहार बनके छाये हो..
अभी तो कुछ कहा नही....
अभी तो कुछ सुना नही....

बुरा ना  मानो  बात का...
ये प्यार है गिला नही.....

अभी ना जाओ छोडकर....  
के दिल अभी भरा नही....।

महाभारती

#महाभारती

आटपाट नगर होतं, तिथं एक राणी राज्य करत होती...
तिला दोन मुलं...

राज्य तसं मोठ्ठं, एकेकाळी सोन्याचा धूर निघणारं... पण लोकं मुळातच सज्जन, पापभिरू...
तर अशा या राज्याच्या राणीचा मुलगा, जो की गादीचा वारस, तो  परगावी शिकायला होता.
आता हे राज्य तसंही बर्याच हितशत्रूंच्या डोळ्यात खुपत होतं.. तस्मात् इथल्या गरीब बिच्चार्या लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे राज्य धूळीला मिळवून इथल्या लोकांना आपल्याकडे ओढून घ्यायची योजना शत्रूंनी आखली.

नी त्या योजने द्वारे, त्या परगावी शिकायला असलेल्या राजपुत्राला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो राजकुमार ज्या खानावळीत जेवायला जायचा, तिथेच एका सुंदर वारांगनापुत्रीची वाढपिण/दासी म्हणून योजना करण्यात आली..
यथावकाश त्या वारांगनापुत्रीने त्या राजकुमाराला स्वतःच्या मुठीत घेतलं. नी राजकुमारानं तिच्याशी लग्न करायचा ध्यास घेतला.
राणी मोठी जहांबाज, तिनं आधी ह्या लग्नाला विरोध केला खरा... पण पुढे पुत्रहट्टापुढे तिचं काई चाललं नाही. आणि त्या वारांगनापुत्री रूपी शत्रूंच्या हेरानं राज्यात प्रवेश केला.

होता होता राणी गेली...

तिच्या मागून हा राजकुमार सम्राट बनला खरा, पण खरा राजकारभार ही शत्रूची हेरच चालवायची. राज्य आणि इथल्या लोकांना खिळखिळं करण्यासाठी परगावच्या  साधुसंतांची आयात, राज्याच्या सैन्यदलांचं खच्चीकरण वगैरे सुरू झालं...
राजाला जसा तिचा डाव कळला, तसं त्यानं विरोध केलान, पण बोलून चालून ती शत्रूचीच हेर.. तिनं बिनबोभाट राजाचा काटा काढला...

हळूहळू राज्यातल्या सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली...

इथली जनता ही बिच्चारी भोळी...
त्यांनीही तिच्यावर विश्वास टाकला डोळे झाकून...
मग तिनं देशाच्या शत्रूंच्या इशार्यावरून  गलिच्छ राजकारण करत राज्यच उद्ध्वस्त करायला घेतलं...
 मंत्रीमंडळ्यातल्या जुन्या जाणत्या राज्यप्रेमी लोकांना सत्तावर्तुळाबाहेर काढलं जाऊ लागलं.. आणि तिथे चोर, दरोडेखोर, भाट अशांची वर्णी लागायला लागली.

जनता सगळं पाहात होती...
त्यातली काही जणं तेव्हाच जागी झाली होती... त्यांनीच प्रयत्न करून
मधे एकदा परिवर्तन घडवून एका देवमाणसाला इथली सत्तासुत्र दिली... त्यानंही त्या संधीचं सोनं केलं...
पण कुणाची दृष्ट लागली काय माहीत,
देशातील बहुतांश जनता खोटेपणाला भुलली आणि   पुन्हा एकदा त्याच वारांगनापुत्रीच्या हाती सत्तासुत्र गेली आणि परगावची असल्यानं 'थेट राज्ञीपद' मिळणार नाही हे कळल्यानं तिनं एका बाहुलीच्या रूपात इथला कारभार करायला सुरवात केली....
त्या राजवटीत नुस्ता सगळीकडे लूट, भ्रष्टाचार बोकाळला...
आणि मग सुरू झाला त्या शत्रूंचा नंगानाच...
मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खात ती राज्ञी नी तिची पिलावळ अक्षरशः राज्याचे लचके तोडू लागले...

 इकडे राणीचा, डोक्याने जरासा अधु आणि त्यामुळेच परकीय शत्रूंच्या हातातलं बाहुलं बनायला उत्तम असा धाकटा मुलगा एवहाना वयात आला....
रोज उठून नवे नवे तारे तोडू लागला...
आपल्या भावी राजाची ही तर्हा  आणि रोजच्या रोज उघडकीला येणार्या राणीच्या पिलावळीच्या चोर्या, ह्यामुळे जनता अगदी कासावीस झाली....

शेवटी काही काळापुर्वी जनतेनं निर्धार करून त्या दुष्ट, शत्रूहेर वारांगनापुत्रीला पदभ्रष्ट केलं आणि आपल्यातल्याच एका कर्तबगार माणसाला आपला सेवक म्हणून नेमलं.
तो ही माणूस जनतेचा विश्वास सार्थ ठरवत राज्याच्या उद्धाराची कामं करू लागला. आल्याआल्या त्यानं
राज्याला लुटणार्या मंडळींची खबर घ्यायला सुरवात केली, राज्यभरात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम सुरू केले , सैन्याला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला लागला.
 राज्यातल्या लोकांना रोजगार मिळावा ह्यासाठी राज्यात नवनवे व्यवसाय उभारणे , शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा ह्यासाठी कायदा , राज्यातल्या माताभगिनींचा त्रास कमी करण्यासाठी विविध योजना ह्या सर्वांयोगे त्यानं दूरगामी फायदा देणारे जनतेच्या भल्याचे अनेक प्रकल्प हाती घेतले.

चोरी आणि लूटीवर आळा घालण्यासाठी केलेल्या त्याच्या योजनांमुळे राणीच्या पिलावळीचं पितळ उघडं पडून बरेच चोर राज्याबाहेर पडू लागले. त्यांनाही पकडण्यासाठी जाळं घातलं गेलं.
एवढंच काय, ती वारांगनापुत्री आणि तिचा तो अर्धवट लेक दोघं स्वतःही एका चोरीच्या प्रकरणात अडकले.
आणि सुरू झाली अटीतटीची लढाई....

त्या सेवकावर, त्याच्या सहकार्यांवर ती वारांगना, तिची पिलावळ आणि तिचा तो अर्धवट लेक रोजच्यारोज वाट्टेल तसे आरोप करू लागले....
 वर्षानुवर्षांच्या गुलामीनं आणि चोरीच्या धंद्यात पिढीजात थोडाथोडका हिस्सा असल्यानं  आंधळे झालेले काही गुलाम अजूनही त्या राज्यद्रोही राणीची भलामण करीत होते.

पण जनता आता सुज्ञ झाली होती....
ती योग्य तो निर्णय घेणार होती......

----
ही गोष्ट आज' वर येऊन थांबल्ये....
इथून पुढे ती काय वळण घेईल आणि राज्याचं काय होईल हे त्या राज्यातल्या सुज्ञ जनतेच्या हातात आहे...

महात्मा

साल्ला,
इतके वेळा प्रयत्न करून झाले पण साधी सिगरेट नै सुटते...

लग्न झालं, सोन्यासारखी बायको आणि गोजिरवाणं पोर मिळालं तरी अजून रस्त्यावरून चालत/वाहन चालवत जाताना प्रेक्षणीय स्थळांकडे 'तिरका कटाक्ष' जातोच...

मोदीबाबा इतके जीव काढून सांगताहेत, तरीही ड्राईव्ह करताना पेटवलेल्या सिगारेटचं थोटूक अजूनही तसंच वाट्टेल तिथे टाकलं जातं..

हाफीसच्या कामासाठी फिरताना सकाळच्या ब्रंचवर  दिवसभर आपोआप काढला जातो, पण ठरवून 'उपास' करायचं म्हटलं की साबुदाणा खिचडी लागतेच...

'शब्दानं शब्द वाढवून काहीही मिळत नाही, हे अनेकदा कळूनही, आता तिशी उलटून गेल्यावर 'अरे ला का रे' करायची खाज कमी झाली असली तरी अजून पूर्ण गेलेली नाईये..
---

अस्खलीत आचरणाचा विडा उचलून तसं वागताना नैसर्गिकरीत्या वा मुद्दामहून समोर  आणल्या गेलेल्या  परिस्थितीतही न चळता स्वतःचा दृढनिश्चय जपणं हे येरागबाळ्याचं काम नाही....

इथे तो 'महात्मा'च पाहीजे....

नर-नारायण

मगाशी मोदीशेठ नी पुतीनकाकांची गळाभेट बघुन आज्जी म्हणाली "मोदींचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हणून जातील त्या सगळ्यांशी मैत्री..."

मला एकदम नारायण आठवला....
"नारायणाची म्हणजे जाईल तिथे ओळख हं.."...!

नारायण....

निस्वार्थपणे किती एक शुभकार्य जमवणारा...

लग्नघरात 'मुहुर्तासाठीच्या पंचांगापासून ते वरातीच्या बॅडवाल्यांपर्यंत'  चौफेर लढणारा...

सगळ्या साळकाया-माळकाया घेऊन स्वस्तातल्या पण उत्तम प्रतिच्या बस्त्यासाठी नी दागदागिन्यांसाठी अख्खा लक्ष्मी रोड पालथा घालणारा...

सगळी कामं एकेका निष्णात व्यक्तीच्या हातात देऊनही जातीनं प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवणारा...

नी इतकं सगळं असुनही दागिन्यांचा डबा ठेवलेल्या फडताळाची चावी आपल्या काखोटीला घेऊन फिरणारा...
प्रसंगी स्वतः बोहलं झाडणारा...
नी मुहुर्ताच्या वेळी दोन अक्षता उडवून पुढल्या कामाला पळणारा...

लग्नघरात चहू बाजूंनी होणार्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देत तहान-भूक-झोप विसरत खिंड लढवणारा....

---

.
.
.

नी कार्य संपल्यावर
"आपण एवढं काम केलंय, आता लोकांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला मान द्यायलाच हवा" असली कुठलीही फालतू अपेक्षा न धरता
आणि
 इतर कुणाला फारशी तोशीस लागु न देता,
तिथेच एखाद्या कोपर्यातल्या कोचावर अंग पसरणारा....

========

तो तिथं आहे म्हणून जरा कुठे वाटेवर येत चाललंय हे सगळं....
नाईतर ह्या घरभेद्यांनी  देश विकायलाच काढलाव्हता सगळी लाज कोळून पीत...